ये मराठे नहीं, भूत है !!!
घोडदळाच्या साह्याने गनिमीकाव्याची युद्धे शक्य होतात; परंतु पायदळाला तेवढा वेळ मिळत नाही. परंतु स्वराज्याच्या शिपायांना हा विचार करायलाही वेळ कुठे होता. रनाळा किल्ल्याला वेढा घालणा-या दिलेरला हुसकावून लावण्यासाठी पायदळातील एक हजार फौजेचा अधिकारी असणा-या रामाजीने दिलेरखानाला डिवचले. मिर्झाराजासोबत पुण्याकडे जाताना असेच पुरंदरजवळ खानाला डिवचल्याने पुरंदरचा तह स्वीकारावा लागला होता. एकंदरीतच मराठ्यांच्या शत्रूत दिलेरखान हा शेवटपर्यंत भारी ठरलेला दिसून येतो. तर रामाजी पांगेराने अफझलखान भेटीप्रसंगी निकराची लढाई दिलेली असल्याने तोही गनिमीकाव्यात पारंगत होता. सापाच्या शेपटीवर पाय पडल्यावर तो जसा चवताळावा त्याप्रमाणे दिलेर त्याच्या मागे लागला. तर रामाजीला पळण्याच्या बहाण्याने खानाला कण्हेर गडाच्या पायथ्याशी एका दरीत गाठायचे होते.
हजार-पाचशे मावळ्यांमागे दिलेरखानाची ३० हजार फौज पाठलाग करायला लागली. चांदवड, कळवण व आताची कण्हेरवाडीजवळ गावालगत कण्हेरगड उभा आहे. या ठिकाणी रामाजीने योजना आखली. दिलेर
खानाने दस्तुरखुद्द शिवाजी राजांनाही नाकीनऊ केले तिथे आपण कसा मुकाबला करावा ही कल्पना तयार होती. इच्छितस्थळी आल्यानंतर रामाजीची फौज थांबली. तिथे अगोदरच बाकीची तयारी झालेली होती. प्रसंग मोठा बाका होता. लढाई विषम होती. पण मराठ्यांना मरणाची भीतीच नसल्याने मागे हटण्याचा प्रश्नच नव्हता. रामाजीने सहका-यांना जवळ बोलावले आणि सांगितले, जे आपलेसोबत असतील ते उभे राहणे. याचबरोबर लढाल तर सोन्याची कडी, पळाल तर चोळी-बांगडी? असे आवेशपूर्ण वाक्य उच्चारताच ७०० हशम उभे राहिले.
रामाजीची ही लढाई जगाच्या पाठीवरील एक वेगळीच लढाई ठरणार होती. मावळ्यांनी संपूर्ण कपडे उतरविले. अंगाला काळे फासले, हातात मशाली घेतल्या. दिलेरखानाची फौज समोर येताच जंगली आदिमानव दिसावेत या वेशात मराठे मोठमोठ्याने ओरडत खानाच्या फौजेपुढे नाचायला लागले. वाळवंटी प्रदेशात लढणा-या मोगली फौजेला ही काय भानगड आहे हे समजायला तयारच नव्हते. सभासद बखरीत याचे वर्णन अतिशय मार्मिकपणे सांगितले आहे. त्यानुसार, दिलेरखान याची फौज पायउतार होऊन चालून घेतले. चौफेरा मावळे लोक वेढिले. एक प्रहर टिपरी जैसी शिमग्याची दणाणते तैसे मावळे भांडिले.
रामाजी पांगेरा बेभान होऊन ठरलेल्या रणनीतीसह खानाच्या फौजेवर तुटून पडला. मशाली घेऊन नाचणा-या या जंगली माणसांनी मोगलांची फौज कापून काढायला सुरुवात केली. १५०० पठाणांना यमसदनास पाठविले. तेव्हा कुठे खानाच्या लक्षात आले, हे जंगली मानव वगैरे काही नसून शिवरायांचे मावळे आहेत. तेव्हा तो रामाजीवर तुटून पडला. आत 'हर हर महादेव' च्या घोषणा सुरू झाल्या. एवढ्या मोठ्या संख्येपुढे रामाजीचा टिकाव लागणे शक्य नव्हते. रामाजीला रूपाजी नळगेसारख्या सहका-यासह वीरमरण प्राप्त झाले.
दिलेरखान चकित होऊन रामाजीचा पराक्रम पाहतच राहिला. एक एकास वीस वीस तीस तीस जखमा तिराच्या, बर्चीच्या लागल्या. लोक मेले. मोठे युद्ध झाले. मग दिलेरखान यांनी तोंडात अंगोली घालून एक घटका आश्चर्य व्यक्त केले आणि म्हटले, "ये मराठे नही, भूत हैठ" रवळा , कण्हेरगडाची मोहीम अर्धवट सोडून दिलेरखान परत फिरला. खरं तर हा रामाजीचा विजय होता. कारण पुढील हालचालीवरून खानाला त्याला रोखायचे होते. त्यात तो यशस्वी ठरला होता. इच्छाशक्तीच्या जोरावर हत्याराविना उघडेबोडके होऊनही युद्धात यशस्वी होता येते हे शिवरायांच्या या मावळ्याने दाखवून दिले आहे.
रामाजीच्या पराक्रमाची वार्ता राजांच्या कानावर गेली आणि दु:खद बातमीने त्यांचे मन हेलावून गेले. स्वारीवर असताना राजांनी रामाजीचे गाव कोरजाईला भेट दिली. तेव्हा रामाजीचे वडील मारुतीचे त्यांनी सांत्वन करून रामाजीचा वडीलबंधू रूपाजीला भावाची जागा देऊन स्वराज्यात सामिल करून घेतले.